
आणि अचानक तू मला विभक्तीत पाहशील, अनुभवशील. हा मला दुसऱ्या कोणत्यातरी कल्पनेने झपाटल्याचा परिणाम असेल. तो माझ्यासाठी योग्य असेल-नसेल मात्र माझ्यातून तीव्र आसक्ती अनुभवलेल्या तू ही एकटेपणाची सक्ती का झेलावीस? पण कल्पनेनं पछाडावं यात माझाही दोष नाही. म्हणून मी तिथून माघारी येईपर्यंत तू झेलशील त्या एकटेपणाच्या क्षणांत तुझ्या सोबतीसाठी हे शब्द . . .
अक्षरांची सोबत कधीपर्यंत असते? नंतर कधी मी पाठवलेलं हे पत्र मोकळं, शब्दहीन, अर्थहीन सापडलं तर? या पत्रात काय वाचशील?
ते वाच जे मी लिहिलं बरसत्या नदीकिनारी तुझ्या बटांवर, सरळसोट नाकावर, रेखीव कपाळावर किंवा शांत खोल डोळ्यांवर.
वाच जे उन्हाळ्यात लिहिलं विरहात – दुराव्यांवर, कडक्याच्या मनभेदांवर किंवा;
असं कर हिवाळ्यात लिहिलेल्या, वाच, तुझ्या हसण्याच्या लकबी आणि लटक्या रागाच्या खुणा किंवा;
वाच दु:खातल्या चेहर्यावरचे भाव तू सांगण्याआधी मी लिहिलेले . . .
नुसतं गोडगोड प्रेमाचंच वाच असंही नाही, वाच, तुझ्यावरील रागात लिहिलं तेही.
किंवा असं कर वाच तुला हवं ते, तुझ्या सोयीचं, आता पत्र तुझंय आणि . . .
मोकळ्या पत्रातला मीही.
– तुझाच.
{fullwidth}